थंडीचे गुलाबी वारे वाहू लागल्यावर अगदी वरच्या कपाटात बांधुन ठेवलेले विणलेले स्वेटर, हातमोजे, कानटोप्या बाहेर येतात. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्टी मधून बाहेर पडताच वेध लागतात ते थंडी स्पेशल खवय्येगिरीचे! कुठल्याही पंचतारांकित हाॅटेलवर किंवा खाऊ गाडीवर मिळणार नाहीत असे पारंपारिक चवीचे पदार्थ ही या खवय्येगिरीची खासियत असते. त्यामुळे अर्थातच ही पार्टी काही ३१ डिसेंबर सारखी ग्लॅमरस फुडची नसते. अस्सल गावरान पद्धतीची शेतात, रानात किंवा घरात होणारी खादाडगिरी असते. या पार्ट्यांचा मेन्यू तसं बघायला गेलं तर रोजच्या सामग्रीतुनच बनतो, पण ह्याला हटके फ्लेवर दिला जातो.
पोपटी किंवा मोगा हा प्रकार कोकण, अलिबाग या भागात खूप प्रसिद्ध आहे. हे बनवायची एक विशिष्ठ पद्धत आहे. हा मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही पद्धतीने बनवला जातो. पण यात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे भांबुर्डीचा पाला. हा पाला साधारण पावसाळ्यात आसपासच्या रानात दिसू शकतो. म्हणून पोपटीचा सिजन सुद्धा याच वेळी असतो. या पाल्याचा पहिला थर लावला जातो. शाकाहारीसाठी अर्थातच भाज्यांचा वापर केला जातो. बटाटे, रताळे, वालाच्या/पावट्याच्या शेंगा, वांगी, कांदे कधीकधी कैरी या सगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. या भाज्या अख्ख्याच धुतल्या जातात आणि त्यांना मध्ये टाचे देऊन केळीच्या किंवा बदामाच्या पानात गुंडाळुन एका मडक्यात ठेवले जाते. त्यावर आलं, मिरची, लसणाची पेस्ट, गरम मसाला, दहीया सगळ्या सामग्रीचा दुसरा थर लावला जातो. ते सगळं पुन्हा भांबुर्डी पाल्याच्या थराने झाकलं जातं. मांसाहारीसाठी याच प्रक्रियेत चिकन किंवा मटणाच्या मसालेदार थराची भर असते. थरांमध्ये मीठ, ओवा यांचीही भर असते. हे मडकं उलटं करून कोळशाच्या किंवा लाकडाच्या जाळावर ठेवले जाते. हे सगळं एखाद्या शेतात, रानात किंवा मोकळ्या जागी केले जाते. त्यामुळे साहजिकच हा जाळ जमीन थोडीशी खणून करतात. शाकाहारी असेल तर साधारण ३० मिनीटं आणि मांसाहारी असेल तर ४५ मिनीटं अशा अंदाजाने भाजलं जातं.
चंद्रकांत वर्तक यांचं ‘मानस हाॅलिडे होम’ हे अलिबाग मध्ये प्रसिद्ध आहे. ते सांगतात, “खास पोपटीसाठी थंडीच्या दिवसात खूप गर्दी असते. हे नक्की कसं बनतं याचं लोकांना खूप आकर्षण आहे. मुख्यत: फॅमिली आणि तरूणवर्ग हे बनवण्यात सुद्धा सहभागी होतात. अगदी भाज्या किंवा चिकन साफ करण्यापासून ते जाळ लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेत ते सहभागी होतात. ही प्रक्रिया एका विशिष्ठ पद्धतीनेच झाली पाहिजे. थरांची क्रमवारी जरी चुकली तरी चवीत फरक पडतो.”
‘अनुभुती’ ही नव्याने सुरू झालेली संस्था आहे. ते माथेरान जवळपासच्या गावात लेकसाईड कॅम्प्स आयोजित करतात. अनुभुतीचे सुदीप आठवले सांगतात, “पोपटी हा इतर पार्ट्यांसारखा रात्रभर चालणारा कार्यक्रम नसतो. ते तयार करण्याची पद्धत हेच त्याचं कौशल्य आणि वेगळेपणा आहे. लोकांना त्याची उत्सुकता असते. ते बनवून,थंड करून, त्याच्यावर ताव मारेपर्यंत तीन चार तास सहज निघून जातात.
त्या त्या विशिष्ट दिवसांचं महत्त्व किंवा ट्रेंण्डी असणाऱ्या गोष्टी, जेवण अनुभुती तर्फे आम्ही हे सगळं माथेरान जवळच्या छोट्या खेडेगावात करतो. तिथल्या लोकांनाही आर्थिक मदत व्हावी हा सुद्धा आमचा हेतू आहे. यावर्षी हे सगळं आयोजन आम्ही २५ आणि २६ जानेवारीला ठेवलं आहे, ज्याला आम्ही ‘पोपटी नाईट’ असं म्हटलं आहे.” जिथे हे सगळं आयोजन होणार आहे त्याला त्यांनी निर्सगाच्या सानिध्यात असलेलं ‘सिक्रेट लोकेशन’ असं म्हटलं आहे.
पोपटी प्रमाणेच दुसरा प्रकार जो पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तो म्हणजे ‘हुरडा’. हुरडा हा प्रकार तुरी किंवा ज्वारीचे कोंब असतात. साधारणपणे कापणीच्या आधी आलेलं कोवळं पीक. हे दाणे दिसायला बाजरी किंवा तांदळाच्या कणी इतक्या लहान आकाराचे असतात. त्याची चव थोडी गोडसर असते त्यामुळे त्यात बारीक चिरलेला कांदा, लिंबू, मसाले टाकुन त्याला चटपटीत बनवले जाते. कधी कधी हे नुसते भाजुन मीठ लावुन सुद्धा खाल्ले जातात. हे सगळं करताना सुद्धा ह्याला भाजणं कौशल्याचं काम असतं. तव्यावर टाकुन गोवऱ्यांच्या जाळावर हुरडा भाजला जातो. गरमागरम हुरडा मोठ्या थाळीवर देऊन त्याच्या जोडीला तीळाची चटणी, घट्ट दही, भाकरी सुद्धा देऊ शकतात. विदर्भ आणि खानदेशात प्रसिद्ध असणारा हा प्रकार महाराष्ट्राचा ‘रांगडा खुराक’ आहे.
सोलापुर जवळ असलेल्या पाकणी गावात राजु भंडारकवठेकर यांचे ‘अभिषेक मळा’ नावाने कृषी पर्यटन केंद्र आहे. ते सांगतात, “आम्ही वर्षानुवर्ष शेतीच करतो. परंतु पावसाच्या बदलत्या वेळापत्रकामुळे बरेचवेळा नुकसान व्हायचे. त्यामुळे शेतीसोबत एक जोड व्यवसाय करायचे ठरवले. लग्न, वाढदिवस, साखरपुडा अशा सार्वजनिक कार्यक्रमांसाठीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. मग बारमाही जेवणासोबत हुरडा पार्टीचे आयोजन करायला सुरूवात केली. ज्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. इकडे हुरडा चुलीवर भाजला जातो. लोकांना चुल आणि त्यावर बनणाऱ्या हुरड्याचं विशेष आकर्षण आहे.”
तसं बघायला गेलं तर या पार्ट्या अगदी काही तासांच्या असतातं. तो पदार्थ बनवुन होईपर्यंतचा काळ गमतीजमतींचा असतो. एक दिवसीय मनमुराद करमणुकीचे हे उत्तम पर्याय आहेत. हे पदार्थ बनवण्याची प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळखाऊ असली तरी ह्याला लागणारी सामग्री मात्र अगदी रोजच्या वापरातली आहे. ताज्या भाज्या, चिकन, मटण, भरपूर मसाले, चूल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकांचा उसळता उत्साह. हल्ली घाई गर्दीच्या, धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून अशा पद्धतीचा विरंगुळा लोकांना जास्त आवडू लागला आहे. घरापासून दुर, मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात पारंपारिक मेजवानी सोबत मैफिली रंगतात. ह्याला पार्टी किंवा अशा पद्धतीचे व्यावसायिक रूप आता येऊ लागलं आहे. पूर्वी सुट्टीत भावंडं आणि नातेवाईक जमले की अंगणात शेकोटी पेटवुन, गाण्याच्या भेंड्या खेळत कौटुंबिक सोहळे व्हायचे जे आता प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.
हा सगळा व्यावसायिक किंवा वाढत्या ट्रेण्डचा भाग झाला. पण या सगळ्या खास मेजवान्या थंडीतच होण्याचं कारण काय किंवा या कौटुंबिक मेळाव्याचे पर्यायी व्यवसाय कसे झाले… या सगळ्याबद्दल शेफ पराग जोगळेकर सांगतात, “पोपटीसाठी अत्यावश्यक असणारा भांबुर्डीचा पाला हा या ऋतुतच उपलब्ध होतो. ह्याला विशिष्ठ असा ओवासदृश्य सुगंध असतो जो अर्थातच शरीराला पोषक आणि औषधी असतो. त्याचा हटके फ्लेवर या पदार्थांना लागतो. यात वापरला जाणारा भाज्यांचा आहारसुद्धा पौष्टिक असतो. साधारण सगळ्याच भाज्या हिवाळ्यात पिकणाऱ्या असतात. म्हणजे अर्थातच शरीराला उष्ण असतात. हुरड्याचे पीक सुद्धा याच वेळी येते. कापणीच्या आधीच कोवळे पीक काढून त्याची ही चटकदार रेसिपी बनवावी लागते. आता तरुणाई नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने शहरात स्थिरावली आहे. गावात जाणे नेहमी शक्य होत नाही पण या पारंपारिक पद्धतींचा मोह सुद्धा आवरत नाही त्यामुळे याचे व्यावसायिकरण सुरू झाले. पण आता बदलत्या काळामुळे परंपरा आणि आधुनिकीकरणाचा संगम झाला आणि या गोष्टी अधिक लोकप्रिय झाल्या असं वाटतं.”
थंडीतली ही खाऊ मैफल आता अशा पद्धतीने ‘खवय्येगिरी’ म्हणून नव्या ढंगाने नावारुपाला आली. तरूणाईला आता पर्यटनासोबत खाऊखुशालीत सुद्धा रूची निर्माण झाली आहे. आता अशी खास रानातली पंगत सजावी म्हणून थंडीतल्या सुट्टीत हे हमखास होणारे प्रयोग आहेत.