‘हारूकी मुराकामी’ हे नाव सध्या तरूण वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. हा मुळत: एक जपानी लेखक आहे. अर्थातच सगळी पुस्तकं आधी जपानी भाषेत लिहीलेली होती आणि काही काळानंतर ती इंग्रजीत सुद्धा प्रकाशित झाली.
एक असाही काळ होता जेव्हा ‘चेतन भगत’ या नावाची लाट तरूणांमध्ये पसरली होती. विशेषत: महाविद्यालयीन मुलांच्या बॅगेत अगदी हमखास सापडणारी पुस्तके म्हणजे चेतन भगत या लेखकाची कुठलीतरी कादंबरी. तसच काहीसं आता मुराकामी बद्दल झालं आहे. पण त्यात फरक म्हणजे या लेखकाचा वाचकवर्ग थोडा व्यापक आणि प्रौढ आहे. साधारण २० ते ३५ वयापर्यंतचा वाचक या पुस्तकांच्या प्रेमात आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून कथेचा अंदाज येतो पण या लेखकाने त्या प्रथेला थोडे वेगळे वळण दिले आहे. मुखपृष्ठाचा रंग आणि त्यावरचे चित्र पेस्टल रंगाचे आहे. त्यामुळे कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. अशा पद्धतीचे मुखपृष्ठ या लेखकाची खासियत आहे जी अगदी सुरूवातीलाच तरूणांना त्याच्याकडे वळवते.
जपानी लेखक असल्याने त्याच्या कथेत तो बाज अगदी सहजपणे जाणवतो. पात्रांच्या नावापासून ते अगदी सभोवतालच्या वातावरण निर्मितीचे वर्णन जपानी आहे.
‘साऊथ ॲाफ दी बोर्डर, वेस्ट ॲाफ दी सन’ हे पुस्तक याच जपानी पठडीतले. जे फिलीप गॅब्रीएल यांच्याकडून या पुस्तकाचा अनुवाद केला गेला आहे. लेखन शैलीच्याही आधी तरूण वाचकाला उत्सुकता असते ती पुस्तकाच्या नावाची!
‘साऊथ ॲाफ दी बोर्डर’ म्हणजे ‘दक्षिण दिशेची सीमा’ आणि ‘वेस्ट ॲाफ दी सन’ म्हणजे ‘पश्चिमेकडचा सूर्य’ यांच्या पलीकडे काय असू शकते! दोन्हीचा उल्लेख हा शेवटाचे वर्णन करण्यासाठी केला जातो. पश्चिमेचा सूर्य हा मावळतीचा असतो आणि दक्षिण दिशा वेस संपवणारी असते. हाच शेवट लेखकाला कथेतून अभिप्रेत आहे. पण हा शेवटाकडे जातानाचा प्रवास सुंदर आहे. सूर्य मावळताना पृथ्वी जणू एक सोनपरी होते तसे अनेक सोनेरीक्षण लेखकाच्या आयुष्यात आले. गुलाबी आकाशासारखे कोमल आणि हृदयस्पर्शी क्षण सुद्धा लेखकाने अनुभवले. दक्षिण भारतासारखे हरिततृण मखमली गालीचे म्हणजे लेखकाचे शब्दवर्णन! इतके समर्पक आणि तपशीलातले शीर्षक तरूण वाचकांना मोहित करून टाकते.
या कथेचा काळ साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाचा आणि जपानमधील भयंकर बाॅम्ब हल्ल्यांनतरचा आहे. त्याला काही वर्षे झाली असली तरी त्याचे परिपाक काही ठिकाणी दिसत होते.
‘हाजिमे’ हा कथेचा नायक. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला एकुलता एक मुलगा! आजूबाजूच्या कुटूंबात दोन किंवा तीन मुलं असताना आपण मात्र एकटेच असा सततचा ताण हाजिमेला जाणवतो. तो एकुलता एक असल्याने लोकांना थोडा लाडवलेला सुद्धा वाटतो. हा वाचकाला जोडणारा दुसरा धागा. आजकाल बऱ्याच कुटूंबात एकुलता एक असण्याचीच पद्धत आहे त्यामुळे पर्यायाने या सोबत येणारी सुख दु:ख वाचकांना आपलीशीच वाटतात. हाजिमे या गुंत्यातून जात असतानाच त्याला ‘शिमामोतो’ भेटते. ती सुद्धा एकुलती एक, स्वत: मध्ये रमणारी सुंदर, सुशील मुलगी. दोघांना एकमेकांचा सहवास आवडायला लागतो. पण हे आवडणं नेमकं काय ते कळायचं दोघांचंही वय नसतं. दोघांच्याही आवडी निवडी तशा टोकाच्या पण तरीही एकमेकांचा वाढत्या सहवासामुळे त्यांचे शालेय जीवन सुखकर होते एवढं मात्र नक्की. शिमामोतोच्या घरी सांगितीक वातावरण असते त्यामुळे बरेचदा हाजिमेला तिच्या घराची ओढ होते. शिमामोतो आणि तिच्या वडिलांसमवेत गाण्यांचे रेकाॅर्ड्स ऐकणे हा त्याचा दिनक्रम झालेला असतो. हळू हळू शालेय शिक्षण संपते, हाजिमे उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात स्थायिक होतो. काळाच्या ओघात शिमामोतो आणि हाजिमेची ताटातूट होते परंतू ते मनाने एकत्र बांधले गेले असतात. बालवयातली ती निखळ मैत्री वयाच्या चौकटीत बांधली गेल्यामुळे तिचे प्रेमात रूपांतर झाले नाही. पण नंतर वय आणि अंतर दोन्ही वाढले आणि जे तेव्हा मिळाले नाही ते आता शोधावेसे वाटले. उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न असा हाजिमेचा प्रवास जसा साधारण मुलाचा व्हायला हवा तसाच होतो. अनेक नातेसंबंध, चढ उतार अशा सगळ्या गोष्टींना तो सामोरं जातो. लेखकाचे वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक प्रसंग अगदी सूक्ष्मपणे सांगितला आहे. दोन व्यक्तींमधली शांतता सुद्धा इतकी समर्पकरित्या वर्णिली जाऊ शकते ही या लेखनशैलीची ताकद आहे. हाजिमेच्या आयुष्यात अनेक मुली येतात पण प्रत्येक वेळी त्याला शिमामोतोची आठवण आल्याशिवाय राहात नाही. शिमामोतो पोलियो रूग्ण असते त्यामुळे तिच्या एका पायाची चाल निकामी असते. हाजिमेला ती गोष्ट अगदी लक्षात असते आणि त्याची आठवण सुद्धा होत असते. शिमामोतोची आठवण आता येईल असे क्षण त्याच्या आयुष्यात लहानपणी आले नसतात आणि म्हणूनच कदाचित त्याचे मन तिच्याकडे सारखे खेचले जात होते. तो एकुलता एक असल्याचा जणू कलंकरूपी एकटेपणा शिमामोतोमुळे नाहीसा होतो. फक्त पुस्तकांमध्ये आणि गाण्यामध्ये रमणारे त्याचे मन माणसांमध्ये रमू लागते.
पुढे जाऊन हाजिमे जपान मधील दोन प्रशस्त जॅझ क्लबचा मालक होतो, एक उत्कृष्ठ पती आणि वडीलसुद्धा होतो पण काहीतरी राहून गेलं, निसटलं अशी जाणीव होत असते.
याच वळणावर त्याला शिमामोतो पुन्हा भेटते. अगदी नकळत, अनपेक्षित… पण तरीही त्याचं मन कशालातरी घाबरत असतं. तो पूर्णत: मोकळा होण्यासाठी संकोचित असतो. शिमामोतो मात्र इतका जुना मित्र पुन्हा भेटल्याच्या अप्रुपात असते. ती अगदी उत्सुकतेने त्याच्याबद्दल सर्वकाही जाणून घेते. भेट होण्यासाठी एकदाही प्रयत्न न केल्याबद्दल खेद व्यक्त करते. हे सगळं हाजिमे अगदी कुतूहलाने पाहत असतो, ऐकत असतो. या सगळ्यात शिमामोतो एक अट घालते ती म्हणजे तिच्या आयुष्याबद्दल काहीही न विचारण्याची! हे सुद्धा हाजिमे मान्य करतो. हा झाला कथानकाचा भाग. यामध्ये भाषाशैली, लेखनशैली, शब्दसंपदा, कथेचे नाट्य या सगळ्यात कादंबरी अगदी अव्वल आहे. पण तरूण वाचकांची मनं खेचणं सोपं काम नाही. साहित्याची सुयोग्य जाण असणाऱ्या आजच्या पिढीला धरून ठेवणारा यातला धागा म्हणजे कथेचा ‘आपलेपणा’. हाजिमे जणू प्रत्येक तरूणात दडला आहे. कारण तो एकटेपणात रमतो, तिथेच खूप व्यक्त होतो. व्यक्तिसापेक्ष असणाऱ्या माणसाच्या भावना प्रेमाच्या ऋणानुबंधात मात्र अगदी सहज एकरूप होतात. हाच मुद्दा लेखकाने अचूक हेरला आणि सगळ्याच तरूण वाचकांची मनं काबीज केली. आज अनेक अभिव्यक्ती माध्यमे आहेत त्यामुळे वाचनाची गोडी लागणे तसे कठीणच. पुस्तक वाचताना आपण स्वत:ची कहाणी पात्रांसकट उभी करत असतो. मुराकामीने जणू फक्त शब्द नाही तर कथानकाचे सीन उभे केले आहेत. ते फक्त वाचले जात नाहीत तर डोळ्यांना दिसतात सुद्धा. हे फार कमी लेखकांना जमते जे मुराकामीला १९९२ सालीच जमले. अशा अनेक परिमाणात हे पुस्तक वाचकांची वाहवा मिळवते.
पण सुरूवातीला सांगितलेला शेवट आता जवळ आलेला असतो. शिमामोतो पुन्हा आयुष्यात आल्यावर वेगळे वळण लागते. आता ते दोघं आधी सारखे नसतात, एकमेकांबद्दलच्या भावना, परिस्थिती काहीच आधी सारखं नसतं. पण हाजिमेचे आपल्या बायकोवर- युकिकोवर आणि लहानग्या मुलींवर नितांत प्रेम असते. त्यांना एकमेकांचा अत्यंत सुंदर सहवास मिळाला असतो. इतकच नाही तर हाजिमेला जे काही व्यावसायिक सुखकर जीवन मिळाले असते ते त्याच्या सासऱ्यांनी दिलेले असते. युकिकोशी त्याचे लग्न झाले नसते तर त्याचे आयुष्य सामान्यच राहिले असते. युकिकोचे पात्र संपूर्ण कथानकात फक्त शेवटी प्रकाशझोतात आले. जेव्हा तिला आपला संसार वाचवायचा असतो आणि हाजिमे समोर दोन दिव्य पर्याय उरतात!
कथानकाचे पैलू हळू हळू अंदाजयोग्य होत जातात पण तरीही वाचनीय असतात कारण शेवट अनपेक्षित असतो. या पुस्तकाचा मतितार्थच ‘शेवट’ असा आहे. शेवट अनेपेक्षित असला की कथानकातली उत्सुकता अधिक वाढते. या अनेपेक्षित शेवटामधली गंमत मुराकामीने टिकवून ठेवली आहे.
मुराकामी हा वाचनामधला तरूणांसाठी नवा ट्रेंण्ड बनला आहे.