‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं. तसं बघायला गेलं तर हा शब्द बराचसा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहे. पण आजकालच्या डिजीटल काळात याचा वापर अनेकविध अंगाने वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत त्यामुळे त्यामागचं तंत्र शोधणं हे सुद्धा एक प्रकारचं संशोधनच आहे. कला आणि सिनेमा क्षेत्रसुद्धा संशोधनापासून वंचित राहिलेलं नाही. सगळ्यात जास्त प्रयोग जर कुठे होत असतील तर ते या क्षेत्रात. कला, सिनेमा, नाटक आणि तंत्रज्ञान यातला संगम साधून एखादी कलाकृती झाली तर ती कशी असेल आणि त्यात नक्की काय नाविन्य असेल याचे संशोधन आजचे युवा नाटककार करत आहेत.
लाईट्स हे माध्यम सुद्धा प्रायोगिक तत्वावर आजकाल वापरलं जातय. नाटकाचा लहेजा काय आहे, त्याचा काळ कुठला आहे यावरून लाईट्सची रंगसंगती ठरवली जाते. सध्याच रंगभूमीवर आलेलं सुयोग निर्मित नवंकोरं नाटक ‘गांधी हत्या आणि मी’ याची प्रकाशयोजना करतायेत भूषण देसाई. ते म्हणतात, “पूर्वी ५०० आणि १००० वॅटच्या लाईट्सचा उपयोग जास्त व्हायचा. तशा प्रकारामध्ये जास्त नावीन्य आणणं शक्य नव्हतं. आता एल.ई. डी. लाईट्सचा वापर होतो ज्यामध्ये आर जी बी फाॅर्मॅट असतो. तीन बेस कलरमधून विविध रंग साकारता येतात. आधी हे सगळे प्रयोग फोटोशाॅप किंवा पेंटींगने करावे लागायचे. ‘गांधी हत्या आणि मी’ या नाटकाचा काळ पाहता त्या पद्धतीचे चित्र उभं करावं लागणार होतं. त्या काळाचा भास होण्यासाठी बऱ्याच प्रवेशांमध्ये ग्रे रंगाच्या लाईट्स वापरल्या आहेत. ग्रे रंगाचे लाईट किंवा तसे इफेक्टस नेहमीपेक्षा अगदीच वेगळे आहेत. ते बेस रंगाच्या सरमिसळीने प्रत्यक्षात आणावे लागतात. फिकट निळा आणि पिवळा या दोन रंगांच्या मदतीने ग्रे इफेक्ट दिला आहे. तसचं फ्रीजनल स्पाॅट लाईट, पार कॅन लाईट, पार एल ई डी लाईट, शार्प लाईट, इंटलिजंट लाईट असे अनेक आधुनिक पद्धतीचे तंत्र वापरून प्रयोग केले जात आहेत.”
नाटकाचे नेपथ्य हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. किंबहुना त्यावरच अख्खं नाटक उभं असतं. आजचे आघाडीचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे सांगतात, “नाटकाची संहिता सगळ्यात महत्त्वाची असते. दिग्दर्शकाला गोष्टीतून नेमकं काय अपेक्षित आहे हे जाणून घ्यायला हवं. दिग्दर्शक पात्रातून नाट्य उभं करतो पण नेपथ्यातून नाट्य उभं करणं हे नेपथ्यकाराचं कौशल्य असतं.”
ऐतिहासिक नाटकाचे सेट हे आव्हानात्मक असतात. तो काळ हुबेहुब उभा करण्यासाठी योग्य ती सामग्री आणि रंगसंगती करणं खूप महत्त्वाचं असतं. ‘गांधी हत्या आणि मी’ मध्ये लाल किल्ला साकारण्यासाठी प्रत्यक्षात रेड स्टोन चे टेक्चर त्याच्यात आणण्याचा प्रयत्न केला. हल्लीच रंगभूमीवर आलेलं अद्वैत थिएटर्स निर्मित ‘इब्लिस’ हे रहस्यमय नाटक आहे, त्यामध्ये कोकणातला जुनाट वाडा दाखवला आहे. काजु आणि नारळाची झाडं, घराच्या काही अंतरावर असलेला समुद्र, वाड्याच्या खिडक्यांची पडझड या सगळ्या त्यातल्या बारकाईने अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. अजून एक नवं कोरं नाटक म्हणजे सुयोग निर्मित ‘थोडं तुझं थोडं माझं’. या नाटकाच्या सुरूवातीचा प्रवेश कवितेने होतो तेव्हा तिथे कृत्रिम पाऊस दाखवला आहे. त्यासाठी स्टेनलेस स्टीलची मोठी रचना करावी लागली आणि सबमरसीबल पंपाचा वापर केला. बालनाट्याचा गाभा आणखीनच वेगळ्या प्रकारचा असतो. मुलांचं लक्ष तीन तास एका ठिकाणी केंद्रित करायचं असतं. अद्वैत थिएटर्स निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकामध्ये जंगलाचा सेट आहे ज्यात नीयाॅन रंगाचा वापर जास्त प्रमाणात आहे. आजकाल सर्कशी मुलांना दिसत नाहीत त्यामुळे सर्कशीतल्या तंबुचा वापर इतर बालनाट्यात केला. या सगळ्या प्रयोगांवर मुलांचा आणि प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. हे सगळं तंत्र नाटकात वापरणं हे मोठा प्रयोग करण्यासारखंच आहे, कारण नाटक हे थेट प्रक्षेपण असतं. त्यामध्ये स्क्रीन सारखं काही लपवता येत नाही. संपादनाला सुद्धा जागा नसते. नेपथ्य आणि प्रकाशयोजना हे भाऊ-बहीण आहेत. चांगला प्रभाव पडण्यासाठी दोन्हीचं समीकरण जुळायलाच हवं.
या क्षेत्रातले प्रयोग सध्या इतके वाढले आहेत की काॅर्पोरेट क्षेत्रामध्ये वावरणारी तरूणपिढी विकेण्ड छंद आणि पर्यायाने वेगळं प्रोफेशन म्हणून याकडे वळतायेत.
‘जयदीप आपटे’ हा काॅम्प्युटर इंजिनीअर आहे. तो प्रकाशयोजनाकार म्हणून सुद्धा एनसीपीए मध्ये कार्यरत आहे. तो असं सांगतो, “सिनेमासाठी छायांकन जितके महत्त्वाचे असते तेवढचं प्रकाशयोजना नाटकाचा पाया असते. श्रोत्यांनी नेमकं काय बघावं किंवा त्यांना नेमकं काय दिसायला हवं ही प्रकाशयोजनाकाराची जबाबदारी असते. लाईव्ह पद्धतीचे सादरीकरण संपुर्ण अंधारात किंवा अति प्रकाशात दोन्ही परिस्थितीत होऊ शकत नाही. प्रकाशयोजनेचा योग्य तो समतोल राखणं गरजेचं असतं. समुद्री लाटा किंवा ॲक्शन सिक्वेंन्स साठी लागणारी प्रभावशाली प्रकाशयोजना सुद्धा नाटकासाठी रंगीबेरंगी लाईट्स वापरून करता येते.”
नाटकातलं संशोधन म्हणलं की आपण जुन्या नवीन नाटकांचा अभ्यास एवढाच विचार करतो पण विज्ञानाचा आधार घेऊन चक्क एक नवीन तंत्रज्ञान उभं करता आलं तर… याच विषयाचा अभ्यास करतोय पुण्याचा युवा तरूण ‘निरंजन पेडणेकर’. निरंजन स्वत: आर्टिफिशीयल इंटलिजन्स एक्स्पर्ट आहे. त्याचं म्हणणं आहे, “कुठलीही कला आणि ए.आय. याचं वाकडं आहे असं म्हणतात कारण माणूस सर्जनशील असतो पण मशीन नाही. आता एकविसाव्या शतकात हे बदलत चाललयं आणि पुढे ते आणखी बदलेल.”
ए.आय. हे खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्याचा नाटकाशी संगम जुळवणं ही कल्पना सुद्धा सध्या संशोधनाच्या जात्यातच आहे. पण निरंजन, काॅम्प्यूटर व्हिजन आणि नॅचरल लॅन्गवेज प्रोसेसिंग हे तंत्रज्ञान वापरून नाटकांचा अभ्यास करत आहे. तो इंग्रजी नाटकं मराठीत अनुवाद करण्याचं कामही करत आहे. असंच एक अनुवाद केलेलं नाटक आहे, सुव्रत जोशी आणि ओंकार गोवर्धन अभिनीत ‘शाही पहारेदार’. एखाद्या नाटकाचं स्क्रिप्ट आपण मशीन मध्ये टाकलं तर त्या नाटकाचा प्रेक्षक वर्ग कसा असेल, ते नाटक व्यावसायिक पद्धतीने किती चालेल अशा अनेक मापदंडांमध्ये आपण मोजु शकतो. किंवा अखाद्या नाटकाचा पर्फोमन्स मला रेट करायचा असेल जेणेकरून नट आणि दिगदर्शक अभ्यास करू शकेल की कुठे सुधारणा करता येईल. अशा पद्धतीचे तंत्र निर्माण करण्याचा अभ्यास तो करत आहे. पुढे तो असंही म्हणतो, “नाटक हे लाईव्ह माध्यम आहे त्यामुळे या क्षेत्रात रोबोट्सचा वापर सुद्धा बहुतांश प्रमाणात होऊ शकतो.
हे सगळे प्रकार आजचे युवा नाटककार करताना आढळत आहेत. या सगळ्यांचं म्हणणं आहे, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. त्याच्या वापरामुळे आजचा प्रेक्षकवर्ग, मुख्यत: तरूणवर्ग प्रौढ आणि जाणता आहे.,डिजीटल माध्यमांमुळे नाटकाला या स्पर्धांमध्ये टिकणं कठीण होऊ शकतं. म्हणून आजच्या कलाकाराला प्रेक्षकांच्या दोन पावलं पुढे असणं गरजेचं आहे. नवनवीन आणि आधुनिक प्रयोग आत्मसात करणं आज काळाची गरज आहे.
दिवसागणिक प्रेक्षकांची आवड बदलत आहे. एखादी कलाकृती आज आवडली म्हणजे ती उद्या सुद्धा आवडेलच असं नाही. त्यामध्ये नवनवीन प्रयोग करून प्रेक्षकांना आपल्याकडे वळवून आणणं यासाठीचे संशोधन चालू आहे.