दै. लोकसत्ता मध्ये दि. २४/१/२०२५ रोजी प्रकाशित
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु फक्त तेवढेच पुरेसे नव्हते. देश म्हणून जगासमोर वाटचाल करताना राज्यघटना, कायद्यांची तरतूद, शासन, अर्थव्यवस्था या सगळ्यांची आवश्यकता असते. भारत देश लोकांचे राज्य होण्याची गरज होती म्हणूनच भारतचे संविधान २६ जानेवारी १९४९ रोजी स्वीकारले गेले आणि १९५० रोजी ते अंमलात आणले गेले. १९५०च्या राज्यघटनेसह, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक म्हणून ओळखला जातो – एक “सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश” जो “त्याच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या तत्वांनी सुरक्षित करतो आणि बांधून ठेवतो.
प्रजासत्ताक दिन भारताची ओळख अख्या जगाला समजावून सांगतो आणि भारताची एक भक्कम ओळख निर्माण करतो. काळ बदलला तरी या दिवसाचे महत्त्व कमी होत नाही आणि येणार्या प्रत्येक नव्या पिढीला याचे मूळ महत्त्व समजण्याची गरज आहे. भारताचे संविधान इतर देशांच्या संविधानाचे मिश्रण आहे, युनायटेड नेशन्स, युनायटेड स्टेट्स, जपान, आयर्लंड कॅनडा, साऊथ आफ्रिका अशा देशांचे कायदे, शासनातल्या तरतुदी, नागरिकत्व यांचे मिश्रण भारताच्या संविधानात आहेत म्हणूनच आपले संविधान सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते.
आजच्या दिवसात प्रजासत्ताक दिन कशा पद्धतीने साजरा केला जातो हे बऱ्याच वेगवगेळ्या माध्यमातून आपल्याला कळत असते परंतु या सम्राटभामुळेच नवोन पिढीला याचा मूळ गाभा कळलेलाच नसतो. आजच्या खेपेला शाळांचे विविध बोर्ड, शिक्षण पद्धती इतक्या नाविन्यपूर्ण झाल्यात की देशाची मूळ तत्वे त्यातून कमी कमी व्हायला लागली आहेत. विविध ठिकाणी होणारे ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम, कर्तव्य पथावर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम या पलीकडे तरुणांसाठी प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमके काय आणि त्याचे काय महत्त्व आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ठाण्याचा ॲडव्होकॅट विराट पवार सांगतो, ” स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याला आपल्या कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस. या दिवसाचे महत्त्व असे की आपल्याला आपले विचार बोलण्यासारखे स्वातंत्र्य असले तरी, इतरांच्या हक्कांचा आदर करणे आणि राष्ट्राच्या विकासास मदत करणे यासारखी अनेक कर्तव्ये देखील आहेत. भारताला फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर सामाजिक, भावनिकदृष्ट्या सुद्धा चांगला देश बनवणं गरजेचं आहे.”
आजच्या काळात हीच भावनिकता आणि समाजभान कदाचित कमी पडते आहे. हक्कांची वेळ येते तेव्हा सगळे धावून येतात परंतु त्यांचीच दुसरी कर्तव्यांची बाजू मात्र लक्षात घेत नाहीत.
भारत हा एकमेव तरुण देश मानला जातो कारण आपल्या देशात तरुणांची संख्या जगात सगळ्यात जास्त आहे. विराट पुढे सांगतो, “सोशल मीडियाचा वापर करून भारताला महान राष्ट्र बनवण्याची सुवर्ण संधी आमच्या पिढीकडे आहे. कायदा-सुव्यवस्था, समानता, स्वतंत्र्य, न्याय-अन्याय या सगळ्याचे अर्थ नव्याने समजून घेण्याची गरज आहे. देशभक्तीची भावना कुठे आणि किती दाखवायला हवी याचेही भान आज असणे गरजेचे आहे. इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की लिबर्टी ही लक्झरी नसून एक जबादारी आहे.”
आपल्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व यासाठी की जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात अनेक देश होते ते स्वतंत्र होताना अनेक देशांची राज्यघटना ही ब्रिटिशांनीच लिहिली. परंतु आपल्याकडे भारतीयांनीच भारताची राज्यघटना लिहावी असा आग्रह तेव्हाच्या अनेक स्वातंत्र्य लढ्यातल्या वीरांचा होता आणि त्यांनी ते अमलात आणून दाखवले. संविधान तयार करताना नेमके काय केले तर राज्य कोणती असशील, कशी असतील, विधानसभा कशी असेल इतर सर्व बाबींचा विचार केला गेला. भाषेच्या आधारावर प्रांत रचना करण्यात आली. या सगळ्यात एक कालावधी गेला. हे संविधान तयार करुन आपण ते 26 जानेवारीला स्वीकारलं. म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं.
प्रजासत्ताक दिन हा भारताच्या ताकदीचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे. त्या वेळी संविधान विचार करून लिहिले गेले म्हणून आज कायदे आणि शासन आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला हीच शिकवण देतो कि आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत. दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचे अतिशय देखणे सादरीकरण आपण दरवर्षी बघतोच. संपूर्ण जगात भारताचं हा दिवस अशा पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी जवळपास ५००० सांस्कृतिक सादरीकरणे होणार असून विविध देशातून येणाऱ्या पाहुण्यांची संख्या १०,०००च्या आसपास आहे. या समारंभातले एक वैशिष्ट्य म्हणजे बिटिंग रिट्रीट समारंभ. या सोहळ्यात आणि संपूर्ण देशाचा सांस्कृतिक वारसा आणि भारताच्या ३ दलांना सलामी देण्यासाठीचे अनेक सुंदर कार्यक्रम सादर होतात. भारताच्या सगळ्या राज्यांचे भव्य-दिव्य चित्ररथ सादर केले जातात.
हा दिवस एकूणच भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि विविधतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण जागतिक स्तरावर स्वतःकडे पाहतो तेव्हा आपल्याला आत्मविश्वास वाटतो कारण आपल्या लोकशाही मूल्यांसाठी आपला देश आणि पर्यायाने आपण ओळखले जातो. ‘प्रजासत्ताक दिन’ हा या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.