२००४ साली फेसबुकचा जन्म झाला त्याच बरोबर व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, लिन्क्डइन सारख्या समाजमाध्यमांची आता मांदियाळी झाली आहे. सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे असे म्हणतात. त्याचे जितके सदुपयोग आहेत तितकेच दुरुपयोगही आहेत. त्याचा वापर, पद्धत, फायदे, तोटे हे कळले नाही तर त्यातून मदत होण्यापेक्षा त्रासच जास्त होऊ शकतो. सोशल मीडिया आता फक्त फेसबुक, व्हाट्सअँप पुरता मर्यादित राहिला नसून आता त्यात डिजिटल मीडिया, ऑनलाईन गेमिंग याचा ही प्रभाव आणि लोकप्रियता वाढताना दिसते आहे. याच भयानक गेमिंग आणि विविध मायक्रोब्लॉगिंग च्या अँप्सने कित्येक तरुणांना व्यसन लावून त्यांचे जीवही घेतले आहेत.
सायबर क्राईमचे प्रकार पूर्वीही होतच होते परंतु तंत्रज्ञानाच्या अति किंवा चुकीच्या वापरामुळे जे प्रकार आत्ता होताना दिसतायेत ते भीतीदायक आणि पेचात टाकणारे आहेत.
तंत्रज्ञानासोबत आलेल्या नव्या माध्यमांवर सध्या हॅकिंगचा विळखा घट्ट बसला आहे. हा विळखा फक्त तरुणाईलाच नाही तर बुजुर्गांनाही बऱ्याच प्रमाणात त्याची शिकार बनवत आहे. सामन्यांबरोबरच आपण अनेक मराठी-हिंदी सिने-सृष्टितील कलाकारांचीही अकाऊंट्स् हॅक झालेले पहिले आहेत. याच विषयाच्या अनुषंगाने केलेला हा लेखनप्रपंच.
सोशल मीडिया हॅकिंग म्हणजे नेमके काय? आणि ते कसे होते?
‘माझं अकाऊंट हॅक झालंय’ हे आपण खूप सहज म्हणतो. पण म्हणजे नेमकं काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हॅकिंग असं काही नसतं, तो एक प्रकारचा स्कॅम असतो. कुठल्यातरी पद्धतीने स्कॅमर्स तुमच्याशी संपर्क साधतात.
त्याच्या सर्वसाधारण पद्धती खालील प्रमाणे:
- तुम्हाला एखादा फोटो पाठवला जातो, त्यामध्ये लपवलेला नंबर ओळखून तुम्हाला अमुक अमुक रुपयांचे बक्षीस मिळेल.
- मी एका कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आहे, त्यासाठी मला वोटींगची गरज आहे. दिलेल्या लिंकवरून तुम्ही वोट करा.
- माझा स्वतःचं अकाऊंट हॅक झालं आहे. त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे, म्हणून तुमची माहिती हवी आहे.
- बिटकॉईनच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती दिली जाते. जेव्हा तुमचं अकाऊंट हॅक झालं असेल तेव्हा तुमच्या फ्रेंडलिस्ट मधल्या लोकांना असे मेसेजेस करतात आणि त्यांचेही अकाऊंट्स ताब्यात घेतले जातात.
अशा पद्धतीचे अजून बरेच मार्ग असतात ज्या मधून हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचतात. ह्याला तुम्ही ओटीपी देऊन किंवा मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन त्यांनी दिलेला एखादा gmail id टाकता तेव्हा तुमच्या डिव्हाईसचा सर्वतोपरी कंट्रोल त्यांच्याकडे जातो. मग दुसऱ्याचं अकाऊंट हॅक करताना पुन्हा हीच सगळी प्रक्रिया ते पुन्हा करतात. तर अशा पद्धतीचं हे एक जाळं आहे .
ह्या प्रक्रियांना आयटी किंवा तंत्रज्ञानाच्या भाषेत फिशिंग, क्लोनिंग असेही म्हणतात.
हॅक झाल्यावर काय करावे?
तुमच्याकडे एक मार्ग असा आहे की, तुम्ही पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे ॲानलाईन तक्रार नोंदवू शकता. तर दुसरा आणि जास्त उपयोगी मार्ग म्हणजे सध्या अनेक सायबर तज्ञ अशा घटनांसाठी कार्यरत आहेत, त्यांची मदत तुम्हाला लगेच मिळू शकते. सायबरतज्ञ डॉ.अक्षय फाटक या बद्दल सांगतात, “हॅक झाल्यावर काय करायचे हा थोडा तांत्रिक मुद्दा आहे. तुमचे अकाऊंट रिकव्हर नक्कीच होऊ शकते, ते अशक्य नाही. हॅकर जेव्हा स्कॅम करतो तेव्हा तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी तुमच्याच डिव्हाईस मधून डिलीट झाला असतो आणि त्या जागी हॅकरचा डेटा असतो. अशा वेळी एकच मार्ग उरतो तो म्हणजे व्हिडिओ व्हेरिफिकेशन. ते आता इंस्टाग्राम, फेसबुकने चालू केले आहे. तुमचे अकाऊंट जे हॅक झालं आहे त्यावर तुमचेच फोटो व्हिडिओ आहेत असे कन्फर्म झाले की फेसबुक किंवा इंस्टाग्रामला तुम्ही व्हिडिओ व्हेरिफिकेशनची रिक्वेस्ट पाठवू शकता. व्हिडीओ जर अस्पष्ट किंवा अंधारातला असेल तर तो स्वीकारला जात नाही. तुमचा स्वच्छ आणि स्पष्ट व्हिडीओ त्यांना द्यावा लागतो. मग तुम्हाला पुन्हा एक प्रोसेस दिली जाते ती जशी च्या तशी करणं तुम्हाला भाग आहे. जर त्यातली एकही स्टेप राहिली तर अकाऊंट रिकव्हर झाल्यावर पुन्हा हॅक होऊ शकते.”
हॅक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
अशा पद्धतीच्या स्कॅमिंग मधला हॅकिंग हा एक भाग झाला. ही लोकं अगदी तुम्हाला धमक्या आणि ब्लॅकमेल सुद्धा करतात. तुमचे विचित्र पद्धतीचे फोटो आणि व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याचा भीतीने तुमच्याकडे पैसे मागतात. बरेचदा यासाठी तुम्हाला ते साधा कॉल, व्हाट्सअँप कॉल अगदी व्हिडिओ कॅाल सुद्धा करतात. अशा वेळी तुमचा चेहरा लगेच कॅप्चर होतो.
- पासवर्ड सतत बदलत ठेवा, पासवर्ड ठेवताना तिथे तुम्हाला स्ट्रॉंग आणि वीक पासवर्ड बद्दल माहिती दिलेली असते ती वाचा व स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा.
- व्हाट्सअँप आणि इतर सोशल मीडियाचं टू -स्टेप व्हेरिफिकेशन कायम चालू ठेवा.
- मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर चांगल्या कंपनीचा अँटीव्हायरस टाका
- तुमचा सगळा डाटा, गोपनीय माहिती, पासवर्ड, बँक अकाउंट्स इतर ठिकाणी जतन करून ठेवा.
- ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी फक्त आणि फक्त बँकेच्या अधिकृत सूचना व नियमांचे पालन करा.
- ओळखीच्या नसलेल्या लोकांचे फोन, मेसेज, व्हिडीओ कॉल कारण नसताना उचलू नका.
- कुठल्याही गरज नसलेल्या लिंक आणि वेबसाईट वर क्लिक करू नका.
- अनोळखी नंबर वरून आलेले व्हॅाट्सॲप कॅाल उचलू नका व परत त्या नंबर्सना कॅाल न करता सरळ ब्लॅाक करा.
या शिवाय डॉ. अक्षय सांगतात, ” ही एक विकृत मनोवृत्ती आहे. डिजिटल लिटरसीची सध्या आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. आज तरुणांना सगळंच सगळ्यांना दाखवायचं आहे. तुम्ही कुठे फिरताय, काय करताय, घरात काय करताय, काय खाताय हे सगळंच आपण पोस्ट करत असतो. तुमचा सोशल मिडियावरचा सगळा डाटा एका सर्व्हरवर जतन होतो. यालाही एक टर्म आहे ती म्हणजे ‘सोशल मीडिया स्टॉकिंग’ तुम्ही काय करताय यावर ते बारीक लक्ष ठेऊन असतात. मी आत्तापर्यंत १८७ अकाऊंट्स रिकव्हर केले आहेत त्या सगळ्या केसेस मध्ये लोकांनीच स्वतःहून काहीतरी ऍक्सेस त्यांना दिलेला आहे. मी आजकाल एक म्हण वापरतो- ‘जान जाये पर ओटीपी ना जाये’ ओटीपी ने काय सुरक्षितता येऊ शकते या बद्दल लोकांना जागरूकता झालेली नाही.
या नव्या माध्यमांसाठी हॅकिंगचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. ह्याच्या कारणांचा आपण शोध घेतला तर हे हॅकर्स म्हणजे आयटी कंपनींमध्ये काम करणारे तरुणंच असतात. परंतु कोरोना आणि आता AI मुळे देशातल्या बऱ्याच भागात बेरोजगारी पसरली . आपल्याकडची एक म्हण इथे खूप योग्य आहे- रिकामं डोकं सैतानाचे घर’. म्हणूनच डॉ.अक्षय सांगतात की सोशल मीडियाच्या या विपर्यासात फक्त आणि फक्त जागरूकता, सावधानता आणि दक्षता हाच उपाय आहे. ती नसेल तर अजून १०० अक्षय फाटक आले तरी परिस्थिती बदलणार नाही.”
आता विविध ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा सायबर क्राईम आणि अकाऊंट हॅकिंगसाठी अनेक तरुण आणि संस्था प्रबंध करताना दिसत आहेत. तरुणांना फक्त समाजमाध्यमांवर कशी पोस्ट करायची एवढीच माहिती आहे. परंतु सध्या प्रॉब्लेम बेसड् सोल्युशनची गरज आहे. पोस्ट केलेल्या माहितीचा विपर्यास झाला तर त्या चक्रव्यूहातून कसे बाहेर यायचे याची माहिती मोजक्यांनाच असते. सोशल मीडियावर कोणती माहिती असावी, कुठली माहिती किंवा पोस्ट आपण पाहाव्यात अथवा पाहू नये याच्या अज्ञानामुळे हॅकिंगचे प्रकार वाढताना दिसत आहेत.
आता सगळ्याच बँकांनीही डिजिटल पद्धतीने व्यवहार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण या सगळ्या व्यवहारांसाठी एकच पासवर्ड ठेवतो. हॅकर्सला यातला एखादा जरी पासवर्ड हाती लागला तरी सगळेच सोशल अकाऊंट्स आणि बँक अकाऊंट्स हॅक होऊ शकतात. ही जाणीव किंवा माहितीच नागरिकांना नसते. सध्या ही जागरूकता असण्याची गरज निर्माण झाली आहे. यातून भीतीने सोशल मीडिया वापरणेच बंद करणे हा उपाय नाही. तर त्याचा वापर सतर्कतेने आणि सजगतेने करणे गरजेचे आहे.